म. टा. प्रतिनिधी, नगरः एकतर्फी प्रेमातून पुण्यात एका कंपनीत नोकरीला असलेल्या तरूणीचे अपहरण करून तिला नगरला आणले. येथे एका ठिकाणी तिला डांबून ठेवले. तरीही लग्नाला नकार देत असल्याने तिचा डांबून ठेवलेल्या अवस्थेतील फोटो आईला पाठविला. शेवटी पोलिस आले आणि तिची सुटका केली. या प्रकरणी समीर शेख अब्दुल समद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील ही युवती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. तिचा नगर येथील मित्र समीर शेख तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तिने लग्न करावे म्हणून तिच्याकडे अग्रह धरीत होता. मात्र, ती तरुणी त्याला नकार देत होती. यासंबंधी त्याने तिच्या आईशीही बोलणे केले होते. तरुणीने नगरला येऊन लग्न करावे, असे तो सांगत होता. मात्र, तिने नकार दिल्याने २९ मे रोजी त्याने त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने तरुणीला पुण्याहून नगरला आणले. तरीही ती लग्नाला नकार देत होती. त्यामुळे तिला त्रास दिला. लालटाकी भागात एका ठिकाणी तीन दिवस डांबून ठेवले. तिचा फोटो काढून तिच्या आईला पाठविला. तरुणीने तिच्या आईशी संपर्क साधला. मी अडचणीत आहे, एवढेच तिला बोलू दिले. त्यानंतर आरोपींनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला.

आपल्या मुलीसोबत गंभीर प्रकार घडल्याचे आईला समजले. त्यामुळे त्यांनी नगरला येऊन तोफखाना पोलिसांकडे शेख याच्याविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तातडीने तपास सुरू केला. आरोपी शेख याला पकडण्यात आले. तरुणीला डांबून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन तिची सुटका करण्यात आली. सुमारे तीन दिवसांनंतर तिची सुटका झाली. त्यानंतर तिने सर्व हकिगत आई आणि पोलिसांना सांगितली. तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. दोघांच्याही पालकांना बोलावून घेण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळके तपास करीत आहेत. आरोपी शेख याला मदत करणाऱ्यांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here