मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. आरक्षण प्रश्नावरून त्यांनी नुकताच राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला. त्यानंतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केली. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
सरकारकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत संभाजीराजेंनी एक ट्वीट केलं आहे. ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संभाजीराजेंनी सरकारवर गंभीर आरोप केल्याने राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा आरोप करताना संभाजीराजे यांनी केंद्र किंवा राज्य सरकारचा थेट उल्लेख केलेला नाही.
संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे अल्टिमेटम
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांनी नुकतंच मराठा आरक्षण आणि समाजाचे इतर प्रश्न यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच आरक्षणाव्यतिरिक्त मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या इतर ५ महत्त्वपूर्ण मागण्या मान्य न झाल्यास आपण ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची घोषणा करू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
नियुक्ती झालेल्या तरुणांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्या, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांसाठीचं वसतीगृह आणि शैक्षणिक सवलती या मुद्द्यांबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संभाजीराजेंनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times