ठाणे: लग्न समारंभ आटोपल्यानंतर लगाम तुटल्याने उधळलेल्या घोड्याचा रस्त्यावर पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी ठाण्यातील कापुरबावडी परिसरात घडली. नंदकुमार चौधरी यांच्या मालकीचा हा घोडा होता.

मानपाडा आनंदनगर येथे एका हॉटेलमध्ये लग्नाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर चौधरी घोड्याला घेऊन आंबेडकर रोडकडे येत होते. दुपारी १ वाजून ४० वाजता घोडा तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ आल्यानंतर घोड्याचा लगाम तुटला आणि हा घोडा उधळला. त्यानंतर घोडा रस्त्यावर धावत सुटला. परंतु धावत असताना अचानक घोड्याचा पाय घसरला आणि हा घोडा खाली पडला. त्यामुळे या घोड्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली होती. मादी जातीच्या या घोड्याचे वय अंदाजे सहा वर्षे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here