दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाल्यापासून कोरोना विषाणूचा वाढता आलेख आता उतरत्या दिशेने घसरत आहे. नागपूरसाठी आणखी एक समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात जिल्ह्यातील ६४९ बाधित लक्षणांमधून बाहेर पडल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. मात्र दुर्दैवाने जिल्ह्यातील कोविडची बाधा झालेल्या रुग्णांचे मृत्युसत्र कमी झालेले नाही. बुधवारी दिवसभरात कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ११ रुग्णांचा प्रकृती ढासळल्याने मृत्यू ओढवला.
कोविड विषाणूने जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून आजवर ४ लाख ७५ हजार १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातील ४ लाख ६० हजार ९२४ रुग्ण वेळीच उपचार मिळाल्याने रिकव्हर झाले आहेत.
निगेटिव्ह अहवालांची टक्केवारीही वाढली
दिवसभरात आढळणाऱ्या नव्या करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आजाराची लागण होण्याचा दर १.५ टक्क्यांवर खाली घसरत आहे. तसाच चाचणीत निगेटिव्ह अहवाल येण्याची सरासरी ९८ टक्क्यांपर्यंत तर आजारमुक्त होण्याची सरासरीही ९७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
ग्रामीण भागाला दिलासा
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ४१५३ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातील १८४३ रुग्ण ग्रामीणमधील तर ३३२० रुग्ण शहरातील आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times