मुंबई: निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील जनतेला सुखद धक्का देणारी बातमी आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांत शिथील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून दर शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

वाचा:

राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं पाच स्तरीय योजना तयार केली आहे. करोना संसर्गाचा दर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची उपलब्धता हा निकष त्यासाठी लावण्यात आला आहे. रुग्णवाढीचा वेग ५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या व ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे. त्यानुसार, १८ जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार असून सर्व दुकाने, उद्याने, थिएटर्स, सलून असं सगळं उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, वाशिम, जळगावचा समावेश आहे.

वाचा:

दुसरा टप्पा: करोना संसर्गाचा दर पाच टक्के आणि ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. त्यात अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार हे जिल्हे आहेत. या टप्प्यात मुंबईचा समावेश असला तरी लोकल ट्रेन लगेचच सुरू केली जाणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

तिसरा टप्पा: करोना संसर्गाचा दर ५ ते १० टक्क्यांपर्यंत असलेल्या व ६० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे जिल्हे या टप्प्यात आहेत.

चौथा टप्पा: करोना संसर्गाचा दर १० ते २० टक्क्यांपर्यंत असलेल्या व ४० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेल्या पुणे व रायगड जिल्ह्याचा या टप्प्यात समावेश आहे.

पाचवा टप्पा: करोना संसर्गाचा दर २० टक्क्यांहून अधिक आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता २५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश असेल. हा गट कायम रेड झोनमध्ये असेल.

राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे:

पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार
दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार
तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक
चौथा टप्पा – निर्बंध कायम
पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here