पहिल्या लाटेच्या सुरुवातीला धारावीत करोनाने थैमान घातलं होतं. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र नंतरच्या काळात महापालिकेने केलेल्या काटेकोर उपाययोजनांमुळे पहिल्या लाटेत करोनाला थोपवण्यात धारावीला यश आलं. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही धारावीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा या परिसराने करोनाला रोखून दाखवलं आहे.
धारावीत सध्या करोनाचे एकूण १९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या लवकरच आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण या करोना संसर्ग साखळी तोडण्यात या परिसराला यश आलं आहे.
वेगवान चाचण्या, करोनाविषयीक नियमावलीची कडक अंमलबजावणी आणि नागरिकांकडून मिळणार सकारात्मक प्रतिसाद या जोरावर धारावीने कठीण वाटणारी गोष्टी साध्य करून दाखवली आहे.
मुंबईवरील धोका अद्याप संपूर्णपणे टळला नाही!
धारावीसह संपूर्ण मुंबई शहरातच करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र असं असलं तरीही मुंबईतील धोका पूर्णपणे टळलेला नाही. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रियेसाठी ५ स्तर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई दुसऱ्या स्तरावर आहे. मुंबई जेव्हा पहिल्या स्तरावर जाईल तेव्हा शहरातील बहुतांश निर्बंध हटवण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.
शहरात २ जून रोजी किती रुग्ण आढळले?
मुंबईत काल २ जून रोजी ९२५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर ६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २ जून रोजीच्या आकडेवारीनुसार शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६७४२९६ इतकी आहे. तसंच बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के इतका आहे. शहरात करोनाचे एकूण सक्रिय रुग्ण १६५८० इतके आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times