गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. सत्तेचे वेसन लागल्यामुळे काँग्रेसचे मंत्री लाचार झाले आहेत. त्यामुळे ते काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करतात, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
खरंतर, राज्यात एकीकडे करोना आणि दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी असा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नसल्यामुळे तातडीने यावर हालचाली करून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान, ‘राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. मात्र, आता बहुजन समाज जागा झाला आहे. आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊच. वेळीच जागे व्हा अन्यथा धनगर समाजाने मुंबईला वेढा दिला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल’, असा घाणाघात धनगर समाजाचे नेते, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर आले होते. अहिल्याबाईंना अभिवादन केल्यानंतर समाज माध्यमातून पडळकर यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आणि राज्य सरकारवरही पडळकर यांनी टीका केली. धनगर आरक्षण आणि आपल्या अन्य मागण्यांसाठी समाजातील तरुणांनी संघर्ष करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times