पुणे : साने गुरुजींपासून अनेक समाजधुरीणांची समृद्ध आणि मोठी परंपरा असलेल्या राष्ट्र सेवा दलात (Rashtra Seva Dal) सध्या गोंधळचा वातावरण असल्याचं समोर आलं आहे. सेवा दलाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघटनेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी आणि कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार पाटील यांनी संघटनेच्या नियमांची पायमल्ली करुन बेकायदेशीरपणे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनेची पदं दिली आणि संघटनेवर कब्जा मिळवला, असा आरोप आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच सेवा दलाच्या अनेक प्रकल्पांचे, मालमत्तांचे हस्तांतरण वा स्थलांतरण सुरू असून अनावश्यक मोठा खर्च केला जात आहे. अनेक गोष्टींमध्ये गैरव्यवहार होत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. संबंधितांनी आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुणे येथील साने गुरुजी स्मारक येथे 4 कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

उपोषणकर्त्यांच्या काय आहेत मागण्या ?
1. लोकभारती पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आणि आमदार कपिल पाटील यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संविधान गुंडाळून ट्रस्ट व संघटना यावर कब्जा मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्यांच्या विनाविलंब राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

2. राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय अध्यक्षांनी सन 2019-22 कालावधीसाठी नियुक्त केलेली असंविधानिक राष्ट्रीय कार्यकारिणी त्वरीत बरखास्त करावी.

3. वारे समितीचा हवाला देवून पदावरून काढून टाकण्यात आलेल्या सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते यांना पुन्हा संघटनेच्या कामात सन्मानाने सहभागी करून घेण्यात यावे.

4. सेवादलात 3 वर्षे आधीपासून सक्रिय नसलेले, म्हणजेच क्रियाशील सदस्य नसलेल्या ज्या ज्या व्यक्ती जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर पदांवर आहेत त्यांनी स्वतःहूनच सेवादल संविधानाचा आदर करत आपआपली पदे सोडावीत. त्या सर्वांनी आधी 3 वर्षे सेवादलात सक्रिय सहभाग घ्यावा.

5. संविधानात उल्लेखलेल्या तरतूदींना बगल देत करण्यात आलेली नवीन जिल्हे निर्मिती रद्द करण्यात यावी. अशा नवीन केंद्रात अस्थायी समिती स्थापन करावी. जी फक्त त्या केंद्राच्या कामाचे निर्णय घेऊ शकेल.

6. संघटनेतील आर्थिक उधळपट्टी त्वरीत थांबवावी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणावी.

7. राष्ट्र सेवा दलाच्या राजकीय भुमिकेबाबत सेवादल मंडळात व्यापक चर्चा घडवून आणून यापुढील काळात कोणालाही राष्ट्र सेवा दल संघटनेचा राजकीय वापर करून घेताच येऊ नये. यासाठी राष्ट्र सेवादल संविधानात आवश्यक ती सुस्पष्टता आणावी. राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे राष्ट्र सेवादलाचे पदाधिकारी व विश्वस्त होऊच शकणार नाहीत अशी स्पष्ट तरतूद सेवादल संविधानात करण्यात यावी.

8. राष्ट्र सेवा दलाच्या सर्व प्रकल्पांचे, मालमत्तांचे हस्तांतरण वा स्थलांतरण तात्काळ थांबवावे.

9. राष्ट्र सेवा दलासाठी आयुष्य दिलेल्या कार्यकर्त्यांवर, RSS चा असल्याच्या अत्यंत अवमानजनक, बेछूट, खोटा व बदनामीकारक आरोप त्वरीत मागे घेऊन त्यांची जाहीर लेखी माफी मागावी.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here