बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलं आहे. मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा आम्हाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा विनायक मेटे यांच्याकडून देण्यात आला आहे.

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विनायक मेटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाचं जीवन अंधकारमय झालं आहे. यामुळे मराठा आरक्षण मिळालं नाहीतर सरकारचं भविष्य आम्हाला ठरवावं लागेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे तातडीने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार हे आम्हाला माहिती नाही असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेली केली.

सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये राज्यातला हा पहिला मराठा क्रांती मोर्चा असणार आहे. या मोर्चाचे काय पडसाद राज्यभर उमटतात हेदेखील पाहणे आता महत्त्वाचं आहे. तर मोर्चाला सुरुवात करण्याआधी विनायक मेटे यांनी नारायणगडाचं दर्शन घेतलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी येवो असं साकडं त्यांनी घातलं.

यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मोर्चातील पुढची रुपरेषा ठरवून राज्यभर आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून आलेल्या संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित आहेत. इतकंच नाहीतर मोर्चा यशस्वी होणारच असा विश्वास विनायक मेटे यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, करोनाचं भीषण संकट असल्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसरपीएफच्या एका तुकडीसह 531 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये 3 डीवायएसपी, 11 पीआय, 28 पीएसआय, 96 महिला पोलिसांसह 306 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here