मुंबई : मालाड मालवणी इथं इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

तसेच, जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.

नेमकं काय घडलं?
मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. तसंच, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य अजूनही सुरु आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दल व पोलिसांचे सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम चालु आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here