अहमदनगर: राज्यभर गाजलेल्या व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे साडेपाचशे पानांचे हे दोषारोपपत्र असून आरोपींनी पैशासाठी अपहरण व खुन केल्याचे त्यात म्हटले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या या हत्या प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

७ मार्च २१ रोजी हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून याचा तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.

त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक झाली. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली कार, मोटरसायकल, हत्यारे तपासात जप्त करण्यात आली होती. तपासादरम्यान सुमारे २५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर सुमारे पाचशे पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.अजय राजू चव्हाण (वय २६ ), नवनाथ धोंडू निकम (वय २३), आकाश प्रकाश खाडे (वय २२), संदीप मुरलीधर हांडे (२६), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय२५) यांच्याविरुद्ध डीवायएसपी संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

असा रचला कट

२७ फेब्रुवारी२०२१ रोजी ढग्याचा डोंगर (ता सिन्नर )येथे या गुन्ह्यातील आरोपी एकत्र आले होते. तेथे गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून त्यांना ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम चोरण्याचा कट रचला गेला. त्या नुसार आरोपींची योजनाबद्धरीत्या हा गुन्हा केला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर आरोपी पकडले गेले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here