संगमनेर: इंदुरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. मात्र गेल्या २५ वर्षांत त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अनेक चुकीच्या चालीरिती बंद झाल्या, असे उद्गार राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी येथे काढले. इंदुरीकरांची शाळा असेल वा ते करत असलेले समाज प्रबोधनाचे काम असेल या चांगल्या बाबी आहेत, असेही थोरात म्हणाले. इंदुरीकरांचं एकीकडे कौतुक करत असताना ज्या विधानावरून वाद सुरू आहे त्या विधानाचं मात्र मी समर्थन करणार नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’, असं वक्तव्य इंदुरीकरांनी एका कीर्तनात केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहुकडून चौफेर टीका होत आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या सगळ्या प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. माझी आणि त्यांची चांगली ओळख असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. संगमनेरात ते पत्रकारांशी बोलत होते.

महसूल विभागात अर्धन्यायिक काम अनेक पातळीवर चालते मात्र कामाचे ऑडिट करण्याची पद्धत नाही. ऑडिट नसल्याने चुकीच्या निर्णयांचा फटका सामान्य जनतेला बसतो. यापुढे महसूल विभागात ऑडिट करून शिस्त आणणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आघाडीला कुठेही धक्का लागणार नाही!

कोणताही तपास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलीस दलाची आहे. परंतु केंद्राकडे तपास देताना एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही त्यावर एकत्रित चर्चा करणार आहोत. अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल, असेही थोरात एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. महाविकास आघाडीला कुठेही धक्का लागणार नाही. आमचं सरकार किमान समान कार्यक्रम घेऊन काम करत आहे. कधी कधी काही असे मुद्दे आमच्यासमोर निर्माण होतात. यावर एकत्रित बसून मार्ग काढत असतो, असेही थोरातांनी यावेळी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here