ऋतुराज यावेळी म्हणाला की, ” भारतीय संघात निवड झाल्यावर मी फारच भावुक झालो होतो, कारण यावेळी मी जिथून क्रिकेटचा प्रवास सुरु केला ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली. पण या प्रवासात आता मला कुठे पोहोचायचे आहे, हेदेखील मी ठरवलेले आहे. भारतीय संघात निवड झाल्याचे ऐकून मला आनंद झाला आहे. पण या संपूर्ण प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचेही आभार मानायला हवेत. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मला आई-बाबा, प्रशिक्षक आणि मित्रांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांनी मी विसरूच शकत नाही. भारतीय संघात स्थान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
ऋतुराज हा आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळत होता. ऋतुराजने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आणि त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले. यानंतर ऋतुराजने सांगितले की, ” संघाला जशी गरज असेल त्यानुसार खेळायला मी नेहमीच प्राधान्य देतो. त्यासाठी आक्रमक फलंदाजी करायचे असो कि बचावात्मक. माझ्यासाठी संघाचे हीत हे सर्वात महत्वाचे आहे. मी परिस्थितीनुसार खेळू शकतो आणि हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. या गोष्टीचा नक्कीच उपयोग मला भारतीय संघाकडून खेळतानाही होईल.”
ऋतुराज आता पुन्हा एकदा राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणार आहे. यापूर्वी भारताच्या १९-वर्षांखालील संघात खेळत असताना ऋतुराजला द्रविड यांचे मार्गदर्शन लाभले होते. याबाबत ऋतुराज म्हणाला की, ” मला या दौऱ्यात बरेच काही शिकता येणार आहे. मला कमी संधी मिळाली तरी त्यामधून मला शिकण्यासारखे बरेच काही असेल आणि याचा फायदा मला भविष्यात नक्कीच होणार आहे. मला पुन्हा एकदा राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळाली आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times