‘काही लोकप्रतिनिधी स्वतः घाणेरडे राजकारण करतात. त्यामुळे त्यांना दुसरे लोक देखील घाणेरडे वाटतात,’ अशा शब्दात अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर अडसूळ यांचे प्रथमच अमरावती शहरात आगमन झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राणा पती-पत्नीवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर फौजदारी खटला भरणार असल्याची माहिती दिली.
अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारने माझ्याविरोधात आलेल्या निर्णयासाठी नक्कीच काहीतरी खिचडी शिजवली, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. त्यानंतर आज माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील राणा यांना जशास तसे उत्तर देत चांगलाच समाचार घेतला.
आनंदराव अडसूळ यांचे जिल्ह्यात आगमन होताच शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अडसूळ यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मागील आठ वर्ष लढलेल्या या न्यायालयीन प्रक्रियेची संपूर्ण माहिती सांगितली. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी सर्व खोटे कागदपत्र जमवून जनतेची फसवणूक केली, असा दावा अडसूळ यांनी केला. तसंच राणा दाम्पत्याने या खटल्याशी संबंधित व्यक्तींवर दबाव आणला, त्यांना धमक्या दिल्या आणि मारण्याचे प्रयत्न केले, असा गंभीर आरोपही अडसूळ यांनी यावेळी केला.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यामुळे अमरावतीच्या राजकारणाने नवं वळण घेतलं असून आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times