अमरावती : अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अशातच पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी जिल्हाप्रशासनाने मार्गदर्शन जाहीर केले. मात्र मोर्शी तालुकयातील उदखेड इथं जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून साखर झोपेत असलेले एकाच कुटुंबामधील ९ जण दबल्याने जखमी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १३ जूनला घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून दबलेल्यांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेला लागूनच कुरवाडे कुटूंबीय राहातात. शाळेची भिंत कोसळून झालेल्या अपघातात आर्यन मंगेश कुरवाडे (६), सुर्यकांता मंगेश कुरवाडे (२६), नर्मदा लक्ष्मणराव कुरवाडे (६५), मंगेश लक्ष्मणराव कुरवाडे (३१), गजानन लक्ष्मणराव कुरवाडे (३४), अंबिका गजानन कुरवाडे (३०), , श्रेया गजानन कुरवाडे (१२) व सोनाली गजानन कुरवाडे (९), साक्षी गजानन कुरवाडे (१४) अशी भिंतीखाली दबून जखमी झालेल्यांची नावे आहेत.

शाळेच्या बाजूला मागील अनेक वर्षांपासून कुरवाडे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दरम्यान रविवारी १३ जूनला सकाळी कुरवाडे कुटुंबीय साखरझोपेत असतानाच ही घटना घडली. परिसरात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शाळेची शिकस्त असलेली भिंत कुटुंबीयांच्या घरावर पडली. त्यामध्ये पहाटेच्या वेळी साखरझोपेत असलेल्या कुरवाडे यांच्या कुटुंबातील नऊ सदस्य दबले गेले.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली. जिल्हा परिषद शाळेची शिकस्त झालेली भिंत कोणत्याही क्षणी पडू शकते, अशी तक्रार कुरवाडे कुटुंबियांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार करूनसुध्दा काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here