वाचा:
पुणे शहर, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या सूचनेनंतर १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५७ लाख ४४ हजार ६६४ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. पैकी २४ लाखांहून अधिक जणांनी पहिला आणि सहा लाख ४१ हजारांहून अधिक जणांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण ३० लाख ४२ हजार ३२० जणांनी लस घेतली आहे. एकूण नोंदणीच्या तुलनेत सुमारे २७ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण होणे बाकी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
वाचा:
शहरात ६३ टक्के लसीकरण
पुणे शहरात सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली असून, हे प्रमाण ६३ टक्के आहे. ग्रामीण भागात ३३ टक्के आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ३४ टक्के लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांच्या अंतराचा नियम केल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्या उलट पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
आरोग्य कर्मचारी अव्वल
आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. फ्रंटलाइन वर्कर्सच्या नोंदीखाली इतरांनीही सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण केल्याने ही संख्या वाढल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. साठीच्या पुढील ज्येष्ठांना पहिला डोस मिळाला असला तरी, दुसऱ्या डोससाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सर्वांत कमी (नऊ टक्के) नागरिकांना दुसरा डोस आणि ४९ टक्के जणांना पहिला डोस मिळाला आहे.
वाचा:
समान लसपुरवठ्याची मागणी
राज्याच्या आरोग्य खात्याकडून , जिल्हा ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचवेळी लशीचा पुरवठा होत आहे. तरीही ग्रामीण भागात लशींचा पुरवठा अपुरा होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लशींचा पुरवठा अन्य शहरांप्रमाणे सारखा करण्यात यावा. पुरवठा वाढविण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.
पुण्यात सर्वच वयोगटांतील सुमारे १२ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. परदेशात नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कामाच्या ठिकाणी तसेच दिव्यांगांसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, महापालिका
लसीकरण केंद्रे (एका दृष्टिक्षेपात)
पुणे शहर- १९७
पिंपरी-चिंचवड- ८५
जिल्हा – ४१७
मटा भूमिका
गेल्या पाच महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्याने लसीकरणात चांगली आघाडी घेतली असली, तरी एकूण लोकसंख्येचा विचार करता वेगवान लसीकरण होणे गरजेचे आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने लसीकरणाचा वेग वाढत जाऊन गेल्या महिन्यात चित्र पूर्ण बदलले. लशींचा अपुरा साठा आणि त्यातच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले केल्याने काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सध्या लसपुरवठ्याची साखळी पूर्वपदावर येत असून, शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मतदार नोंदणीप्रमाणेच लसीकरणाबाबत जनजागृती करून प्रत्येक व्यक्ती लसीकरणात सहभागी होईल, यासाठी राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना एकत्र काम करावे लागेल. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळायचा असेल, तर पुढील महिना-दीड महिन्यांत दररोज एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेच लागेल.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times