करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहेत. त्यातून मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मुलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनेही योजना आखल्या आहेत. तर काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी काही ठिकाणी अशा मुलांना बेकायदेशीरपणे दत्तक देण्याचे प्रकार सुरू झाले आहे. सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांतून यासंबंधीच्या जाहिरात दिसून आल्यावर सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.
यासंबंधी महिला व बालअपराध प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘करोनामुळं आई-वडील मृत पावलेल्या बालकांच्या दत्तक देण्याच्या बाबत अवैधरित्या, बेकायदेशीरपणे जाहिराती समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा जाहिराती प्रसारित करणे अथवा समाजमाध्यमांद्वारे त्याची प्रसिद्धी करणे बाल हक्क संरक्षण कायदा २०१५ च्या विरोधी आहे. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहिराती देणार्या आणि अशी अवैध कामे करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत. कोविड केंद्रामध्ये असलेल्या महिलांचे संरक्षण, तसेच करोनाने आई वडिलांचे निधन झाले आहे. अशा बालकांच्या हक्कांचे संरक्षण, अशा बालकांना बेकायदेशीर प्रकारे दत्तक देण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाहीच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे.’
वाचा:
अनेक घटनांमध्ये संबंधित मुलांच्या जवळचे नातेवाईक किंवा त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी येऊन पडलेल्या मंडळीकडून असे प्रकार केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागास कळवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times