‘मुंबई महापालिकेकडे निधीची कमतरता नाही. तुम्ही मुदतठेवींवर अठराशे कोटी रुपये व्याज म्हणून कमवत आहात. मग बेघरांना निवारागृहे उभारण्यात पालिकेला अडचण काय? उड्डाणपुलांखाली आणि फुटपाथवर लोक राहत असल्याचं पाहायला मिळते. प्रत्येक वॉर्डमध्ये अद्याप त्यांच्याकरिता निवारागृहे का उभारण्यात आलेली नाहीत?’ असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने पालिकेला विचारणा केली आहे.
‘मुंबई शहराला तुम्हाला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर या मूलभूत गोष्टी आहेत. मुंबई महापालिकेचे करोनाविषयक उपाययोजनांविषयी जगभरात कौतुक झाले आहे.. सर्वच आघाड्यांवर कौतुक व्हायला हवे. त्यामुळे बेघरांच्या प्रश्नावरही गांभीर्याने पावले उचलावीत, अशा सूचना न्या. एस. पी. देशमुख आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पालिकेला केल्या आहेत.
पालिकेचे वकिल कोर्टात काय म्हणाले?
मुंबईत कालच्या दिवसात करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण फक्त ५७५ एवढे होते. तसंच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून रुग्णालयातील खाटांचे नियोजनही पूर्णपणे नियंत्रणात आहे,’ अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात दिली आहे.
दरम्यान, हायकोर्टानेच आक्रमक शब्दांत सूचना दिल्यानंतर मुंबईत पालिकेकडून बेघरांच्या प्रश्नावर आगामी काळात नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात, हे पाहावं लागेल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times