मुंबईत करोना चाचण्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होऊन ते ३.७९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तर ऑक्सिजन खाटा रुग्णांनी व्यापण्याचे प्रमाण २३.५६ टक्के आहे. ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी मुंबईत अद्याप दररोज ५०० ते ७०० करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबई संसर्ग दरात गट क्रमांक एक आणि ऑक्सिजन खाटांचे प्रमाण गट दोनच्या निकषांप्रमाणे आहे. असे असले, तरी तूर्तास गट क्रमांक तीन प्रमाणेच निर्बंध कायम राहणार असल्याचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी सांगितले. सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकार आणि पालिकेने घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे मुंबईतून करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे १ जूनपासून मुंबईत निर्बंध शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पाच गट तयार करून निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. मुंबईची स्थिती सुधारली असली, तरी दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आणि मुंबई महानगर प्रदेशातील रुग्णसंख्या पाहता निर्बंध आणखी शिथील करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात परिस्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
घटत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई सध्या गट क्रमांक एकमध्ये आली असली, तरी तीन आठवड्यांनंतर तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पालिका सध्या संभ्याव्य तिसऱ्या लाटेसाठी आराखडा तयार करीत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली, म्हणून सर्व निर्बंध शिथील करून सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास अचानक गर्दी वाढल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने सध्या सावध भूमिका घेतली आहे. रुग्णसंख्या घटलेली असल्याने पुढील आठवड्यासाठी काही निर्बंध शिथील करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times