करोना रोखण्यासाठी एसआयआय आणि कोडाजेनिक्सद्वारे विकसित करण्यात आलेली लस या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी एक सुरक्षाकवच असल्याचा दावा केला जात आहे. ‘ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. ही लस सहा महिन्यांत मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगानं या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झालं आहे, असं एसआयआयचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.
२०२२ पर्यंत तयार होणार
मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर करोना व्हायरसला रोखण्यासाठी तिचा वापर करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. २०२२ च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. ही लस विकसित झाल्यानं जागतिक स्तरावर फैलावलेल्या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे हेच यातून दिसतं, असं पूनावाला यांनी सांगितलं.
चीनमध्ये १८०० हून अधिक बळी
चीनमधील हुबेई प्रांतात करोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या व्हायरसची लागण सुरू झाली. करोनामुळे १८६८ जणांचा बळी गेला असून ७२ हजार ४३६ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे १०९७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ११ हजार ७४१ रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times