न्यूझीलंडने फायनलमध्ये टॉस जिंकला आणि भारतीय संघाला पहिला धक्का बसला. कारण खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक होती. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल या भारताच्या सलामीवीरांनी यावेळी दमदार फलंदाजीचा उत्तम नुमना पेश केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर प्रहार करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या १५ षटकांमध्ये न्यूझीलंडला कोणतेही यश मिळवून न देता संघाचे अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे आता मोठी खेळी साकारतील असे वाटत होते, पण या दोघांनीही यावेळी निराश केले. रोहित शर्मा यावेळी ३४ आणि गिलने २८ धावांची भर घातली.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर मात्र कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाला सावरले. सुरुवातीला त्याला चेतेश्वर पुजाराकडून साथ मिळाली. पण पुजारा दोन चौकारांनिशी आठ धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांची जोडी चांगली जमली. कोहली आणि अजिंक्य यांनी यावेळी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही रचली. खेळ थांबला तेव्हा विराट कोहली हा नाबाद ४४, तर अजिंक्य हा नाबाद २९ धावांवर खेळत होता. आता उद्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट आणि अजिंक्यकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी विराट आणि अजिंक्य किती धावांची भागीदारी रचतात, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
आज वरुण राजाने कृपा केल्यामुळे चांगला खेळ होता होता. पण त्यानंतर अपुऱ्या प्रकाशामुळे काही वेळा खेळ थांबवावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जास्त धावांची भर घालता आली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times