प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत युती करण्याची विनंती केली आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळं भाजपच्या गोटात आनंद आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या पत्रावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, भाजपचे नेते निलेश राणे यांनी मात्र प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जावंच लागणार, असं वक्तव्य केलं आहे.
‘प्रताप सरनाईक यांना आता तुरुंग दिसायला लागलं आहे. यांचे सगळे मंत्री आहेत त्यांना जेल आता जवळ दिसतेय म्हणून युती पाहिजे. जेलमध्ये जायचं नसेल तर काय करायचं तर भाजप समोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का. पण अशी माफी मिळत नाही. त्यांना गुडघे पण जेल मध्येच टेकावे लागतील. त्यांना माफी नाही,’ असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे.
‘आघाडीतील आमदार, मंत्री जे अडचणीत आहेत. त्यांना असं वाटतंय हे सगळं करुन त्यांना जेलमध्ये जावं लागणार नाही. पण प्रताप सरनाईक, अनिल परब यांना जेलमध्ये जावंच लागणार आहे. कायदा कोणाला सोडत नाही. कायदा समान आहे,’ असंही राणे यांनी म्हटलं आहे.
वाचाः
प्रताप सरनाईकांनी पत्रात काय म्हटलंय?
अवैध मालमत्ता प्रकरणामुळे वादात सापडलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. ‘महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष फोडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्यावे. यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या तुमच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल,’ असे या पत्रात म्हटले आहे. ‘पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली, तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो,’ असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times