कोल्हापुरातील मराठा समाजातील कार्यकर्ते जयंत पाटील, निवास साळोखे, बाबा इंदुलकर तसेच सुजित चव्हाण, रविकिरण इंगवले यासह अनेकांची आज मराठा आरक्षणाबाबत बैठक झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झालेल्या या बैठकीत मंगळवारी आंदोलन करण्याचे निश्चित झाले. पोलिसांनी आंदोलकांना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण मराठा समाजाच्या मागणीसाठी हे आंदोलन करणारच, असा निर्धार सकल मराठा समाजाने व्यक्त केला.
संभाजीराजेंबाबत काय म्हणाले आंदोलक?
संभाजीराजे यांच्या आंदोलनास आपला पाठिंबा राहीलच, पण काही मागण्यांबाबत राजेंनी ठाम भूमिका न घेतल्यामुळे आपण हे आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सायंकाळी स्पष्ट केले. सरकारने दखल न घेतल्यास यापुढेही अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
नेमकं काय घडलं?
एकीकडे संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलन केले जाईल, त्यांचे नेतृत्व मान्य आहे, असे याच सकल मराठा समाजाने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत ही सकल मराठा समाजाची बैठक झाली होती. मात्र संभाजीराजे यांनी काही मागण्या सरकारकडे थेट न केल्याने आणि सरकारला मुदत दिल्यामुळे हे आंदोलक नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अशोकराव चव्हाण यांच्यासोबत संभाजीराजे यांची जी बैठक झाली त्या बैठकीत सर्व मागण्या मान्य करून तसे पत्र द्यायला हवे होते, ही या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. पत्र न देता केवळ तोंडी मान्यता दिल्यामुळेच हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times