काटेवाडी, माळेगाव बुद्रुक, उंडवडी क.प., मोरगाव, मानाजीनगर, शिर्सुफळ, पणदरे आणि सावळ या आठ गावांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. २४ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत आठ गावांत लॉकडाऊन करण्यात आले आहे.
काय सुरू राहणार, काय होणार बंद?
नव्या निर्णयानुसार गावात खासगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मंगल कार्यालय, मॉल, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फक्त मेडिकल, कृषि सेवा केंद्रे, किराणा दुकाने आणि दूध डेअरी सुरू राहणार आहे. गावातील लोकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये, निष्कारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘बारामतीमधील आठ गावांत करोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध लागू केले आहेत; तसेच संचारबंदीच्या काळात पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करावे,’ असं बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी म्हटलं आहे.
बारामती तालुक्यात काय आहे स्थिती?
एकूण रुग्णसंख्या : २५,४३१
बरे झालेले रुग्ण : २४,४७४
मृत्यू झालेले रुग्ण : ६५०
बारामती शहराची लोकसंख्या : १ लाख ५० हजार
तालुक्याची लोकसंख्या : ३ लाख ५४ हजार
पॉझिटिव्हिटी रेट : १० टक्के
लॉकडाऊन केलेली गावे आणि रुग्णसंख्या
काटेवाडी : २७
सावळ : २४
पणदरे : २३
शिर्सुफळ : १५
मानाजीनगर : १२
माळेगाव बुद्रुक : १०
उंडवडी क.प. : १०
मोरगाव : १०
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times