पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आज सकाळी सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मी आतापर्यंत वैचारिक राजकारण पाहिलं, पण सूड घेण्यासाठी एखाद्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचं मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत होत्या.

अनिल देशमुखांच्या ईडी छाप्याविषयी विचारलं असता विरोधी पक्षाकडून हे जाणूनबुजून केलं जात आहे. मी आतापर्यंत विचारांचं राजकारण पाहिलं आहे. विरोधकांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर होत असल्याचं मी कधीही पाहिलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

‘पवार साहेबांनी विचारांचं राजकारण केलं पण…’
अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती. पवार साहेबांनी वैचारिक राजकराण केलं पण कधीही सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला नाही. यासाठी कोणत्याही तपास यंत्रणेची मदत घेतली नाही. पण अनिल देशमुखांच्या बाबतीतही हेच झालं आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. पण ठीक आहे हम लढेंगे’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

वैयक्तिक सूड घेण्याचा अजेंडा नाही, भाजपला टोला
राज्यात सध्या कोरोनाचा धोका वाढत आहे. या भीषण जीवघेण्या संसर्गामुळे अनेक समस्या समोर आहेत. अशात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही सगळे मंत्री, नेते, अधिकारी, आमदार, खासदार याच कामात व्यस्त आहोत. विरोधकांप्रमाणे सुडाचं राजकारण करण्यासाठी आम्हाला वेळ नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. इतकंच नाहीतर राज्यात कोरोना,आरोग्य व्यवस्था आणि बेरोजगारी अशी संकट असताना विरोधकांकडू असे प्रकार करणं दुर्दैवी आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here