भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. ‘ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,’ असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.
रोहिणी खडसे यांनी कालही या संदर्भात ट्वीट करत फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. ‘आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १ ऑगस्ट २०१९ रोजी आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारे केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाहीत, हे तुम्हाला माहीत व्हायला हवे होते,’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या वतीनं राज्यभरात चक्का जाम आंदोलन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्यासह अनेक मोठे नेते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. तर, दुसरीकडं भाजपच्या खोटारडेपणाचा निषेध करत काँग्रेसनंही राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times