मॉल आणि थिएटर अद्याप बंद आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील. सायंकाळी 4 पर्यंत जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, हॉटेल्ससुद्धा 50 टक्के क्षमतेसह सुरू होतील. पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांवरही बंदी लागू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त 50 लोकांना विवाह सोहळ्यासाठी आणि जास्तीत जास्त 20 लोकांना अंत्यसंस्कारासाठी परवानगी आहे. स्टुडिओच्या बाहेर चित्रपटांचे चित्रीकरण केले जाणार नाही. मुंबई लोकल सामान्य प्रवाश्यांसाठी बंद राहील.
यामुळे राज्यातल्या अनेक ठिकाणी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये दुकानं उघडणार असल्याचा ठाम निर्णय संघटनांकडून घेण्यात आला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी यासारख्या ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत व्यापारी दुकान उघडण्यावर ठाम आहेत. खरंतर, राज्यातल्या मोजक्याच जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. पण तरीदेखी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन का? असा सवाल समोर येत आहे.
काही जिल्ह्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध का?
कोरोनाचा धोका कमी होत असला तरीही प्रतिबंध आणि नियम कठोर करण्याचे पहिले कारण म्हणजे डेल्टा प्लस व्हेरियंट. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दुसर्या लाटेच्या वेळी जानेवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संपल्याचा भ्रम होता. परंतु फेब्रुवारी महिन्यात अमरावती आणि अचलपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. यावेळी सरकारने फक्त अमरावतीतच लॉकडाऊन ठेवलं आणि इतर सर्व जिल्हा खुले ठेवण्यात आले होते. याचा परिणाम असा झाला की, मार्चमध्ये भारतात दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
तिसऱ्या लाटेचे धोके काय आहेत?
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. इतकंच नाहीतर काही जिल्ह्यात अमरावतीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात पॉझिटिव्ही रेट 10 टक्के आहे. सातारा जिल्ह्यात पॉझिटिव्ही रेट 9.50 टक्के आहे. कोल्हापुरातही पॉझिटिव्ही रेट 8 टक्के आहे. या चार जिल्ह्यांच्या आकडेवारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times