आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत एमएमआरडीएनं मालाड इथं उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचं हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांनाच पुढील संकटाची जाणीव करून दिली. ‘सध्या आपल्याकडं करोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यामुळं आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या बेड रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट पुन्हा उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील,’ असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
वाचा:
राज्य सरकार संकटाचा सामना मोठ्या तयारीनिशी करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ‘पहिल्या लाटेच्या वेळेस आपण वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये देशातलं पहिलं फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारलं. आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांचं हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही, असं सांगतानाच, ‘दररोज १५ लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचीही आपली तयारी आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
वाचा:
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस. के. श्रीनिवासन उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times