जम्मू विमानतळावर स्फोट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या बॉम्बहल्लानंतर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे ‘गुपकार’ गँगशी चर्चा केली. यावरही शिवसेनेनं बोट ठेवलं आहे. ‘जम्मू-कश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे ‘गुपकार’ गँगशी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी चर्चा केली. एकमेकांचे हसतमुख फोटो काढून प्रसिद्ध केले. या प्रकारास ७२ तास होत नाहीत तोच जम्मू-कश्मीरात हिंसाचार व दहशतवादी हल्ल्यांचे थैमान सुरू झाले आहे. अर्थात या हल्ल्यामागे पाकचा हात असणारच. ते काहीही असले तरी पोलीस, वायुसेना व संपूर्ण संरक्षण व्यवस्थेलाच हे आव्हान आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच, या बॉम्बहल्ल्यांचा धमाका कानाचे पडदे फाडत असतानाच ‘पुलवामा’ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी पोलीस अधिकाऱ्याची त्याच्या कुटुंबासह हत्या केली. या दोन्ही घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचाः
‘जम्मू-कश्मीरवर पंतप्रधानांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावली. यात कश्मीरातील बहुतेक सर्वच नेते सहभागी झाले. ३७० कलम हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पंतप्रधान सर्वपक्षीय नेत्यांना भेटले. यापैकी बहुतेक नेत्यांना फुटीरतावादी, देशद्रोही, दहशतवाद्यांचे हस्तक वगैरे ठरवून दिल्ली सरकारने बंदिवान करून तुरुंगात ठेवले होते. त्याच नेत्यांबरोबर चर्चा करून प्रश्नांना गती द्यावी असे केंद्र सरकारला का वाटले?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
वाचाः
‘३७० कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरात अशांतता निर्माण होऊ नये म्हणून फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्तींसह अनेकांना तुरुंगात डांबलेच होते. हे सर्व लोक दिल्लीत चर्चेत सहभागी झाले. त्या चर्चेची हळद उतरली नसतानाच जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरू झाले ही बाब चिंता वाढविणारीच आहे. जम्मू-कश्मीरचा प्रश्न फक्त लष्कर किंवा बंदुकीच्या गोळीतूनच सुटेल, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करूनच सुटेल या मानसिकतेतून सरकार बाहेर आले आहे. यापासून कायमचे दूर जाता येणार नाही. दहशतवाद्यांना ठेचावेच लागेल आणि पाकिस्तानला अद्दल घडवावीच लागेल, पण त्याचबरोबर कश्मिरी जनतेला विश्वास द्यावा लागेल,’ असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times