बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात गेल्या तीन वर्षांपासून दुमजली इमारत बांधून त्या ठिकाणी सहा दुकाने व तळमजल्याचे व्यापारी संकुल तयार करण्यात आले होते. याबाबत विनोद शर्मा यांनी मनपा नगररचना विभागाकडे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार नगररचना विभागाने मोजणी केल्यानंतर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानतंर अतिक्रमण निर्मूलन विभागाला बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपाचे पथक याठिकाणी दाखल झाले. गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याने काही काळ कारवाई थांबविण्यात देखील आली. मात्र, पोलिसांनी येऊन परिस्थितीवर नियंत्रणात आणली. त्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या जेसीबीकडून सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या संकुलाचे बांधकाम करणारे दिलीप सिखवाल यांनी ही जागा आमच्या मालकीची असल्याचे सांगितले. १९६४ साली तत्कालीन नगरपालिकेने याठिकाणी भाजीपाला मंडईसाठी आरक्षण टाकले होते. मात्र, ते आरक्षण रद्द झाले असून, मनपाने मोबदला देखील दिलेला नाही. तसेच हे बांधकाम तोडण्यासाठी मनपाने कोणतीही नोटीस आम्हाला बजावली नाही, केवळ तोंडी आदेश मनपाने दिले असल्याचा आरोप दिलीप सिखवाल यांनी केला आहे.
इमारत जेसीबीवर कोसळली
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानतंर गाळेधारकांचा विरोध मावळला. त्यानतंर जेसिबीच्या साह्याने येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. हळू हळू अतिक्रमण काढत असतानाच इमारतीचा पाया खचल्याने पूर्ण इमारतच जेसीबीच्या फाळ्यावर कलली. फाळ्यावर पूर्ण इमारतीची एक बाजू तोलून राहिल्याने सुदैवाने चालकासह तेथे उपस्थित असलेल्या कुणालाही इजा झाली नाही. अखेर दुसरे जेसीबी आणून फाळा काढून पूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times