शहरालगतच्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने अखेर आज बुधवारी घेतला. या निर्णयामुळे पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. (finally 23 villages around the city will be included in the )
प्रशासनाच्या अंदाजानुसार, ही गावे समाविष्ट झाल्यामुळे महापालिकेची हद्द ४८५ चौरस किलोमीटर, तर महसूल विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर झाली आहे.
हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने चार ऑक्टोबर २०१७ ला ३४ पैकी ११ गावांचा समावेश केला. उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. ही २३ गावे समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने तीन वर्षांची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली होती. ही मुदत ऑक्टोबर महिन्यात संपली होती. राज्यातील सत्तांतरानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ही २३ गावे होणार समाविष्ट
म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.
क्लिक करा आणि वाचा-
असे वाढले क्षेत्रफळ
> १९९७ मध्ये सुमारे २५० चौरस किलोमीटर
> २०१७ मध्ये ३३१.५७ चौरस किलोमीटर
> प्रस्तावित नवीन २३ गावांतील क्षेत्रफळ १८४.६१ चौरस किलोमीटर
> पुण्याची प्रस्तावित हद्द ५१६.१८ चौरस किलोमीटरपर्यंत
क्लिक करा आणि वाचा-
गावे समाविष्ट करण्याचा इतिहास
युती सरकारच्या काळात १९९७ साली ३८ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या ३८ गावांमध्ये बहुतांश सध्या समाविष्ट होणाऱ्या गावांचा समावेश आहे. २००१ साली यातील १५ पूर्ण आणि पाच अंशत: गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली. त्यामुळे महापालिका हद्दवाढ २३ गावांपुरती मर्यादित राहिली होती. तर, त्यातही पाच गावे अंशत: होती. पुन्हा २०१२ साली येवलेवाडी गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आल्यानंतर नव्याने २८ गावे समाविष्ट करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेरीस, २०१४ साली राहिलेली तसेच नवीन अशी ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी इरादा जाहीर केला होता. तर, त्याच वेळी ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फुरसुंगी आणि देवाची उरळी ही गावे पूर्ण आणि अशंत: असलेली नऊ गावे अशा ११ गावांचा ऑक्टोबर २०१७ साली करण्यात आला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times