फडणवीस सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. वृक्षसंवर्धनाचं काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सरकारच्या दाव्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते.
राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता नव्यानं हा विषय ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी वृक्षलागवडीच्या संख्येवर संशय व्यक्त करून तसं पत्रंही विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांना लिहिलं होतं. त्यानुसार राठोड यांनी वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नेमके किती वृक्ष लावण्यात आले. ते नेमके कोणते होते आणि त्यातील किती जगले? या साऱ्याची चौकशी केली जाणार आहे.
मुनगंटीवार यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘भाजप सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीच्या प्रयत्नांची लिम्का बुकनंही नोंद घेतली होती. सरकारचे एकूण ३२ विभाग या अभियानात होते. त्या सर्वांची चौकशी नव्या सरकारनं करावी. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी व्हावी आणि गरज वाटल्यास श्वेतपत्रिकाही काढावी,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times