किरण रावनं करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत हा खुलासा केला होता. या शोमध्ये बोलताना ती म्हणाली होती, ‘आमिरच्या आयुष्यात स्वतःसाठी जागा तयार करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. कारण त्यावेळी त्याचा पहिली पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट झाला होता. तो कठीण काळातून जात होता. आमिरसारख्या पतीसोबत राहणं खूपच कठीण आहे कारण त्याला पार्ट्या करणं किंवा पार्ट्यांना हजेरी लावणं अजिबात आवडत नाही. मोठ्या आवजात गाणी ऐकणं त्याला आवडत नाही. यामुळे लोकांना वाटतं की तो एक गंभीर स्वभाव असलेला व्यक्ती आहे. पण असं नाही आहे. तो स्वतःमध्ये रमणारा व्यक्ती आहे.’
दरम्यान एक वेळ अशीही आली होती की, आमिर आणि किरण यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद होऊ लागले होते. किरणनं रागाच्या भरात आमिरला चांगलंच सुनावलं होतं. याचा उल्लेख आमिरनं एका मुलाखतीत केला होता. किरण त्याला म्हणाली होती, ‘वास्तवात तुला आमची अजिबात काळजी नाहीये. मला वाटतं आम्ही तुझ्यासाठी नाहीच आहोत. तुझ्या आयुष्यात आम्हाला जागाच नाही आहे. आम्ही तुझ्यासोबत असलो तरीही तुझं मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच गुंतलेलं आहे. मला माहीत आहे की, तुझं माझ्यावर प्रेम आहे. पण मला याचा विश्वास नाहीये आणि जर मी तुला बदलण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य होणार नाही कारण तेव्हा तू ती व्यक्ती राहणार नाहीस ज्याच्या मी प्रेमात पडले होते.’ किरणच्या अशा बोलण्यानं आमिरचं आयुष्य खूपच बदलून गेलं होतं असं त्यानं या मुलाखतीत सांगितलं होतं.
दरम्यान आता किरण राव आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. २८ डिसेंबर २००५ रोजी या दोघांचे लग्न झाले. आमिर आणि किरण दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत यासंबंधीची माहिती दिली. लग्नाच्या १५ वर्षांनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खानने पहिलं लग्न रिना दत्ताशी केले होतं. ‘कयामत से कयामत तक’ सिनेमाचं शूटिंग सुरू असताना आमिरने रीनाशी लग्न केलं होतं. १८ एप्रिल १९८६ रोजी केलेलं हे लग्न जवळपास १६ वर्ष चाललं. २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिरनं २८ डिसेंबर २००५ रोजी किरण रावशी लग्न केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times