नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. विराटच्या कर्णधारपदासह संघाच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर 1983 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी विराट सेनेचा बचाव केला आहे. लोक लगेच टीका करण्यास सुरवात करतात. टीम इंडिया सतत बाद फेरीत स्थान मिळवत आहे, असं ते म्हणाले.

याबाबत कपिल देव यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ‘आपला भारतीय संघ नेहमी उपांत्य आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो हे काही कमी महत्त्वाचे आहे का? पण भारतीय लोक लगेच टीका करण्यास सुरवात करतात. प्रत्येकवेळी स्पर्धा जिंकणे शक्य नाही. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली ते पाहा. अंतिम आणि उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर आपण दबाव पेलू शकत नाही? असं म्हणणं किती योग्य आहे? असा सवालही त्यांनी टीकाकारांना विचारला आहे.

कपिल देव पुढे म्हणाले की, 2014 पासून 2021 पर्यंत भारतीय संघाने निश्चितपणे प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत माजल मारली आहे. 2015ची विश्वचषक स्पर्धा, 2016ची टी-20 आणि 2019च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने धडक मारली होती. 2014चा टी-20 विश्वचषक, 2017ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला.

62 वर्षीय कपिल देव म्हणाले की, ‘तो दिवस प्रतिस्पर्धी संघाचा होता, त्यांनी चांगला खेळ खेळला. पण पराभव आपण लगेच गांभीर्याने घेतो. जर एखाद्या सामन्यात कामगिरी खराब झाली, तर माध्यमांत ते शंभरवेळा दाखवले जाते. अशा प्रकारच्या दबावामुळेही आपण आणि इतर प्रतिस्पर्धी संघांनी अनेक सामने जिंकले आहेत, हेदेखील जाणून घेतले पाहिजे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here