मोर्चाला परवानगी नाकारली असली तरीसुद्धा आपण कोणत्याही परिस्थितीत मराठा आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात रविवारी मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर रविवारी सकाळपासूनच कडक संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
ग्रामीण भागातून मोर्चासाठी नागरिक सोलापुरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा वाहनांना बंदी घालण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. पोलिसांनी मराठा आक्रोश मोर्चात सामील होणाऱ्यांना इशारा दिला असून संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. तसंच मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने बसेसच्या मार्गामध्ये बदल केला आहे.
दरम्यान, रविवारी निघणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चातील गर्दीला कसे रोखायचे असा प्रश्न सोलापूर पोलिसांनी पडला आहे. गर्दी झाल्यास पोलिस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times