चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं अनिल देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. त्याविरोधात देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर देशमुख यांनी ईडीलाही पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी ईडीच्या कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतले आहेत. ‘कुठलीही चौकशी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून व्हायला हवी. माझी चौकशी कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावी हा नागरिक म्हणून माझा घटनात्मक आणि मूलभूत अधिकार आहे. मात्र, माझी चौकशी योग्य पद्धतीनं चाललेली नाही. नियमांचं उल्लंघन केलं जात आहे,’ असं देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचा:
‘या कारवाईविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळं या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत माझी चौकशी लांबणीवर टाकावी,’ अशी मागणी देशमुख यांनी पत्रातून केली आहे.
चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवताना अनिल देशमुख यांनी याआधीही ईडीला पत्र लिहिलं होतं. वय, आजारपण आणि करोनाचा धोका पाहता मी प्रत्यक्ष चौकशीला हजर राहू शकत नाही. त्याऐवजी माझे अधिकृत प्रतिनिधी हजर राहून सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देतील. गरज वाटल्यास मी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रश्नांना सामोरा जाण्यास तयार आहे, असं देशमुख यांनी म्हटलं होतं. मात्र, ईडीनं त्यांची विनंती फेटाळत तिसरं समन्स बजावलं होतं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times