पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घालत, सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. १२ आमदारांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘बारा आमदारांचं झालेलं निलंबन हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळाला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये, त्यामुळं अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘बारा आमदारांचे वर्तन तुम्ही पाहिलं असेल. ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याची अशी भूमिका आहे की. त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times