काय घडले नेमके?
महाविकास आघाडीचा निषेध करत भाजपच्या आमदारांनी आज विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत प्रतिविधानसभा भरवली. भाजपच्या मित्रपक्षांचे आमदारही विधानभवनाच्या पायरीवर बसले होते. पायऱ्यांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आणि प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे पाटील आजूबाजूस बसले होते. या प्रतिविधानसभा किंवा अभिरुपी विधानसभेचे अध्यक्ष आमदार कालिदास कोळंबकर यांना बनवण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत सरकारच्या धिक्काराचा ठराव मांडला.
क्लिक करा आणि वाचा-
विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूपी विधानसभा सुरू झाल्यानंतर तिचे पडसाद विधानसभेत उमटले. सत्ताधारी आमदारांनी या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेतला. विधानभवनाच्या पायऱ्यांवरची ही प्रतिविधानसभा बरखास्त करा अशी मागणी आमदारांनी विधानसभेत केली. तसेच बाहेरच्या अभिरुपी विधानसभेला माईक कोणी दिला, माईकसाठी परवानगी कोणी दिली, असे प्रश्न विचारण्यात आले. मुख्यत: आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे माईक तत्काळ काढून घ्या, असे आदेश दिले.
क्लिक करा आणि वाचा-
त्यानंतर मार्शल विधानभवनाच्या पायऱ्यांवर पोहोचत त्यांनी माईक देण्याची विनंती केली. मात्र, भाजपचे आमदार त्यांचे ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांमुळे विधानभवन परिसरात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच मार्शलांनी माईक काढून घेतले. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की झाली.
क्लिक करा आणि वाचा-
माईक काढला तरी आमचा आवाज बंद होणार नाही- फडणवीस
यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही, असे फडणवीस संतापाने म्हणाले. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार आहेत. मार्शलांद्वारे माध्यमांची देखील मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times