राम मंदिर बांधण्यासाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना केली. मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का स्थापन करता आली, असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला होता. देश तर सर्वांचा आहे आणि सर्व धर्मियांचा आहे, असंही ते म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या वक्तव्यावरून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पवार यांनी खुर्चीसाठी पक्ष फोडले. आयुष्यभर त्यांनी मतांचे तुष्टीकरण केलं आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत मशीद बांधा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे, मग आरोप करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी पवार यांना केला आहे.
तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांचे अहवाल हे महाविकास आघाडीचं सरकार राज्य विधीमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत माध्यमांनी मुनगंटीवारांना विचारणा केली, त्यावर तसं केल्यास स्वागतच आहे, असं ते म्हणाले. युतीच्या सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांवरही आरोप झाले होते. मग सर्वांचेच अहवाल मांडण्यात यावेत. आम्ही रडणारे नाहीत. लढणारे आहोत. ईडी चौकशी लागली की रडायला सुरुवात होते, थयथयाट केला जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times