मुंबई: ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’, असे चिथावणीखोर वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार व राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांच्यावर चहुबाजूने टीकेचा भडीमार होत असून मनसे आणि भाजपने पठाण यांना थेट इशाराच दिला आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पठाण यांचा समाचार घेण्यात आला आहे. ‘आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण… ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकेच सांगतो की, जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल, असा इशाराच मनसेने पठाण यांना दिला आहे.

‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवरूनही पठाण यांना आव्हान देण्यात आले आहे. ‘अरे वारिस पठाण, कोणाला घाबरवताय? शिवसेनेचे महाराष्ट्र सरकार तुमच्या धमक्या शांतपणे सहन करेल, पण भाजप व महाराष्ट्रातील जनता तुम्हाला असा धडा शिकवेल की तुमची ही चिथावणीखोर भाषणे बंद होतील’, अशा शब्दांत भाजपने पठाण यांना सुनावले आहे.

मी माफी मागणार नाही: पठाण

‘देश वा कोणत्या धर्माविरुद्ध बोलणारी वारिस पठाण ही शेवटची व्यक्ती असेल! माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. काहीही झाले तरी मी माफी मागणार नाही. खरंतर भाजपचेच लोक भारतीयांत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे स्पष्टीकरण देत वारिस पठाण आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.

काय म्हणाले होते वारिस पठाण?

मुंबईतील भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांचा कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाषणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या भाषणात अत्यंत प्रक्षोभक भाषा त्यांनी वापरली आहे. ‘आता आमचा महिलावर्ग…वाघिणी बाहेर पडल्यात तर तुम्हाला घाम फुटलाय…भविष्यात आम्ही सगळेच रस्त्यावर उतरलो तर काय होईल, याची कल्पना करा. आम्ही फक्त १५ कोटी आहोत पण निश्चितच १०० कोटींवर आम्ही भारी पडू’, असा इशारा पठाण यांनी दिला आहे. पठाण यांच्या याच विधानावरून वादळ उठले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here