महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीपासूनच हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत होते. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आलेल्या ईडीच्या नोटिशी हा राज्यात ऑपरेशन लोटसचा एक भाग असल्याच्या चर्चांना उत आला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे नेते वारंवार हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल अशा विश्वास व्यक्त करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आघाडीतील नेते व संबंधित नातेवाईक ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कोण आहेत हे नेते व त्यांच्यावर कोणते आरोप केले गेले याचा घेतलेला सविस्तर आढावा.
भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी- काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापन केलं. असंख्य राजकीय चढ उतारानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारनं आता दीड वर्षहून अधिक काळ पूर्ण केला आहे. या वर्षांत बराचसा काळ करोनाच्या संकटकाळात निघून गेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचे कसोटीचे दिवस आहेत. महाविकास आघाडीतील अनेक मंत्री व नेते ईडीच्या रडारवर आले आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीपासूनच हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत होते. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आलेल्या ईडीच्या नोटिशी हा राज्यात ऑपरेशन लोटसचा एक भाग असल्याच्या चर्चांना उत आला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे नेते वारंवार हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल अशा विश्वास व्यक्त करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आघाडीतील नेते व संबंधित नातेवाईक ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कोण आहेत हे नेते व त्यांच्यावर कोणते आरोप केले गेले याचा घेतलेला सविस्तर आढावा.
अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळं अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केल्यानंतर देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आरोप काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या घराजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी, ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांची याआधी चौकशी केली होती. मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून अनिल देशमुख यांना चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आणि ती त्यांच्या विविध संस्था व बनावट कंपन्यांमध्ये वळवण्यात आली, असा आरोप ईडीने केला आहे.
प्रताप सरनाईक
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागेही ईडीचा ससेमिरा लागला आहे. सरनाईक यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी सुरु होती. प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत.
काय आहे आरोप?
मनी लाँडरिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एका जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक यांची मुले विहंग व पूर्वेश तसंच, निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावरही या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक हे प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी या कंपनीत ब्रिटनहून मुंबई पोहोचलेल्या परदेशी निधीचा गैरवापर झाला, असा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) संशय आहे.
एकनाथ खडसे
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्यांचे जावई गिरिश चौधरीहे सुद्धा अडचणीत सापडले आहेत. ईडीने गिरीश चौधरी यांना अटकही केली आहे.
आरोप काय?
पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. प्रत्यक्षात त्या भूखंडाची किंमत ३१ कोटी रुपये होती. एकंदर गैरव्यवहार बघता या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
‘ईडी’तील सूत्रांनुसार, ‘या व्यवहारात खडसे यांच्या वतीने गिरीश चौधरी यांनी बेंचमार्क बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीमार्फत हा भूखंड खरेदी केला. त्यासाठी बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीला प्रोफिशियन्स मर्केंडाइज, अब्जायोनी ट्रेडिंग, अदामिना ट्रेडिंग, केमेक्सगूड्स प्रा. लि. व पर्ल डीलर्स प्रा. लि., या पाच कंपन्यांपकडून पैसे मिळाले. या पाच कंपन्यांनादेखील याआधी समन्स बजावण्यात आला होता. परंतु, त्या कंपन्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मुळात त्या सर्व बनावट कंपन्या असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार
सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अवैध रीतीने खरेदी करणे आणि मनी लाँडरिंग, अशा आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी कंपनीची सुमारे ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
आरोप काय?
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतील (पीएमएलए) फौजदारी कलमांन्वये चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, कारखान्याचा प्रकल्प आणि यंत्रसामग्री जप्त करण्याचा हंगामी आदेश ‘ईडी’ने काढला आहे.
‘ईडी’ची कारवाई का?
– राज्य बँकेच्या संचालकांनी आपल्याच नातेवाइकांना कारखान्याची अल्प भावात विक्री केली
– त्यात ‘एसएआरएफएईएसआय’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप
– या कारखान्याने पुढे पुणे जिल्हा बँकेकडून ७०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले
– यात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times