भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबरोबर एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं आहे. तसंच, संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही. राऊत यांना राणे दोषाची कावीळ झाली असुन त्यांना राणेंचे खाते छोटेच वाटणार असा, टोला दरेकरांनी लगावला आहे.
‘संजय राऊतांना नारायण राणेंना काही मिळाले तरी ते छोटेच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची कावीळ झाली आहे. राणे यांना मिळालेले खाते छोटे आहे, की मोठे हे येणाऱ्या काळामध्ये राणे त्यांच्या कामातून दाखवून देतील. त्यांना कोणतही खाते दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम त्यांनी नक्की केलं असतं,’ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
‘ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होतं नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरं जायला हवं. कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढुन आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातुन संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपलं निर्दोषत्व सिद्ध करत कोणत्याही चौकशीला सहकार्य करणं उत्तम ठरेल,’ असे मत यावेळी दरकेर यांनी व्यक्त केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times