आषाढीसाठी मानाच्या १० पालखी सोहळ्यातील ४०० भाविक आणि १९५ मठाधिपती यांना शासनाने शहरात थांबण्याची परवानगी दिलेली आहे. परवानगी दिलेले वारकरी सोडून जे भाविक आषाढीपूर्वी दाखल झाले आहेत त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. अजूनही पंढरपूरमध्ये करोनाचे संकट संपलेले नसल्याने भाविकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .
आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा स्नानालाही बंदी घालण्यात आलेली असल्याने ज्यांना परवानगी दिलेली आहे असेच भाविक चंद्रभागेपर्यंत पोहोचू शकणार आहेत. सोलापूर जिल्ह्यापासून पंढरपूर शहरापर्यंत त्रिस्तरीय नाकेबंदी करण्यात येणार असल्याने एकाही परवानगी नसलेल्या भाविकाला सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आषाढी बंदोबस्तासाठी येणारे सर्व अधिकारी कर्मचारी हे शक्यतो दोन लस घेतलेले असावेत अशी तयारी केली असून प्रत्येकाची करोना चाचणी केली जाणार असल्याचंही पोलिस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले .
दरम्यानै, बंदोबस्ताला येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला करोना किट दिले जाणार असून करोनाच्या दृष्टीने सर्व तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. आषाढीसाठी मुख्यमंत्री महापूजेला येणार असल्याने मंदिरात पूजेच्या वेळी कमीत कमी उपस्थितीबाबत प्रस्ताव शासनाला दिल्याची माहितीही तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times