कित्येक वर्षांपासून चुलीवर रांधून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या कष्टकरी महिलांनी पै पै जोडून घेतला. चुलीच्या धुरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि काबाडकष्टाचा पीळ त्यामुळे थोडा सैल झाला. मात्र आता लॉकडाउन, करोनाचा संसर्गाने कामाची चिंता, महागाईचा भडका, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती यांमुळे महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. पोट भरायला पुरेसा पैसा नाही, सिलिंडरवर इतके पैसे कुठून खर्च करायचे, असा प्रश्न त्या विचारतात.
गॅस सिलिंडर परवडत नाही म्हणून अनेक घरांत चुली पेटू लागल्या आहेत. पण या महागाईने आमच्या चुलीवरही पाणी ओतले आहे. ‘हाताशी काम नाही, पैसा नाही. आज ताटात भाकरी असेल की नाही, याची खात्री देता येत नाही. करोनाकाळामध्ये साथीचा संसर्ग फैलावू नये म्हणून काळजी घेतली जाते. पण लोकांचे पोट कसे भरेल याकडे कुणाचेही लक्ष नाही. महागाईमध्ये जगायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यावे लागेल’, अशी व्यथा ‘कोरो’च्या एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागपुरे यांनी व्यक्त केली.
‘करोनामुळे कामावर परिणाम झाला. घरात येणारा आर्थिक स्त्रोत आटला आणि महागाई मात्र वाढत आहे. पैसे कुठून आणणार? किराणा, भाजीपाला यांचे दर चढतेच आहेत. त्यात भर म्हणून गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. त्यामुळे चुलीचा पर्यायच पुन्हा स्वीकारला. करोना संसर्गाच्या भीतीमध्ये जगण्याची लढाई आहे’, असे हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील उर्मिला कुरणे यांनी सांगितले. कराडच्या प्रतिज्ञा पवार यांनी मागील दीड वर्षापासून परिस्थिती अधिकाधिक बिकट होत गेल्याचे म्हटले. ‘हाताला कामच नसल्याने घरात पैसा येणार कसा? करोनाच्या आधी नोकरी गेली, त्यानंतर छोट्यामोठ्या कामातून थोडेफार पैसे मिळवून दिवस ढकलणे सुरू आहे. तेलाचे दर वाढले, डाळी महागल्या. ही परिस्थिती ना कमवू देत, ना जगू देत. चुलीवर रांधायचे बंद करून अनेक वर्षे झाली होती. आता पुन्हा सरपण गोळा करणे आणि चूल पेटवण्याचा नेम सुरू झाला’, असे पवार म्हणाल्या.
पुन्हा त्रासाचे दिवस
बुलढाण्यातील महिला मंडळ प्रतिनिधी उषा नरवाडे यांनी गॅसची सुविधा गावामध्ये हवी यासाठी महिलांच्या आरोग्याचा, श्वसनविकार होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा मुद्दा वारंवार पुढे मांडण्यात आला. तो योग्यही होता. पण आज लॉकडाउनच्या काळात महिलांना रोजगार नाही. घरात पैसा येत नसताना चुलीच्या धुराशिवाय पर्याय नाही. हातात चार पैसे आल्यानंतर ग्रामीण भागातल्या माणसांचे जगणेही बदलले. आता पुन्हा तेच कष्टाचे दिवस आले आहेत, असे सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times