संगमेश्वर व लांजा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर शहरातही पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं राजापूरमधील अर्जुना व कोदवली या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. मुख्य चौक असलेल्या जवाहर चौकाला पाण्याचा वेढा बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. पोलीस, नगरपरिषद प्रशासन २४ तास सतर्क झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी १३०.२६ मि.मी. पाऊस झाला. त्यात मंडणगड २१५.१०, दापोली ९४.३०, खेड ४६.५०, गुहागर १३५.६०, चिपळूण १०२.५०, संगमेश्वर १४५, रत्नागिरी १६२.९०, राजापूर १२८.७०, लांजा १४१.७० मि.मी. नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या मंडणगड तालुक्यात अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले आहेत. तेथील परिस्थिती आटोक्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. पुराचे पाणी ओसरल्याने संपर्क तुटलेल्या राजापूर, मंडणगड, खेड तालुक्यातील गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रत्नागिरी तालुक्यात मंगळावारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. सायंकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतली होती. काजळी नदीची पाणीपातळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत स्थिरावली आहे. चिपळूण, खेडमध्येही वाशिष्ठी, जगबुडी नद्यांचे पाणी पातळीपर्यंत आले आहे. आजही पावासाचा जोर वाढल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times