: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात मंगळवारी रात्री रस्त्यावरच राहून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. या इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याने प्राण गमावले. मात्र त्यानंतर पोलिस प्रशासनाने केलेल्या कृत्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात १३ जुलैच्या मध्यरात्री पाऊस पडत असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे वाहनाने धडक दिलेल्या सदर इसमाला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाला ते ठिकाणी आणि रुग्णालय हे अंतर फक्त १०० मीटर इतकंच होतं. मात्र अशा स्थितीतही पोलिसांनी सदर व्यक्तीचा मृतदेह चक्क कचऱ्याच्या गाडीत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

परिस्थितीमुळे संपूर्ण आयुष्य रस्त्यावर संघर्ष करत काढलेल्या व्यक्तीचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाला आणि प्राण गमावल्यानंतरही त्याच्या नशिबी अवहेलनाच आली. चक्क कचऱ्याच्या गाडीत सदर व्यक्तीचा मृतदेह नेल्याने पोलिसांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेमुळे असं कृत्य करणाऱ्या पोलिसांना संवेदना उरल्या आहेत की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, या गंभीर घटनेची दखल प्रशासन घेणार का आणि संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here