जयंत सोनोने | :

कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणी आणि अंबा देवी एकवीरा देवी कुलदैवत असलेल्या अमरावती जिल्ह्यात सध्या नारी शक्तीचा जागर सुरू असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी ते अधिकारी अशी महत्त्वाची पदे महिला सांभाळत असल्याने जिल्हा प्रशासनाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. तर लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभाताई खोडके या असून पोलिस आयुक्त म्हणून डॉ. आरती सिंह या कार्यरत आहेत. यासोबतच आता जिल्हाधिकारी म्हणून पवणीत कौर या रुजू झाल्याने जिल्ह्याच्या प्रगतीची दोरी महिलांच्या हाती आली आहे.

अमरावती जिल्हा अनेक वर्षांपासून ताईंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्ह्याने देशाला प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या. अंबादेवी आणि एकवीरा देवी कुलदैवत असलेल्या अमरावती जिल्ह्यात राजकारण व प्रशासनातील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर महिला लोकप्रतिनिधी व अधिकारी काम करत आहेत.

राज्यात करोनाचा उद्रेक झाला असताना अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी कायदा व सुरक्षेच्या व्यवस्थेसह नागरिकांना मदत करण्यावर भर दिला. खासदार नवनीत राणा यांनी राज्य आणि केंद्राचा समन्वय साधून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याच कर्तबगार महिलांच्या फळीत आता जिल्हाधिकारी म्हणून पवणीत कौर रुजू झाल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील प्रशासकीय व राजकीय पदावर महिलांना संधी मिळाल्याने प्रगती व विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here