जालना: एप्रिल महिन्यात भाजपकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं जाणार असे बोलले जात असतानाच केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. हे सरकार कुणी पाडण्याची गरज नाही. ते तर आपसातल्या भांडणातूनच कोसळणार आहे, असे नमूद करत दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

जालन्यात शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी दानवे बोलत होते. ‘राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला काहीच रस नाही. सध्याचे तिघेजण तीन बाजूने सरकारला ओढत आहेत, यांच्या भांडणातूनच हे सरकार पडणार आहे’, असे दानवे म्हणाले.

महाराष्ट्रातील सरकार हे स्थगिती सरकार म्हणून ओळखले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील सगळ्याच निर्णयांना स्थगिती देण्याचे एकमेव काम हे सरकार करत आहे. आम्हाला वाटते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या हिताचे अनेक नवीन निर्णय घ्यावेत, फडणवीस सरकारच्या चांगल्या निर्णयास स्थगिती न देता त्यांची अंमलबजावणी पुढे चालू ठेवावी, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.

येत्या २५ तारखेला जिल्ह्यातील भाजपचे सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची तयारी करण्यासाठी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक दानवे यांनी घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे म्हणाले, ‘राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या प्रक्रियेत मागे पडलेले आहेत. याचा मराठा समाजाने आता त्यांना जाब विचारला पाहिजे.’ गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. जिल्ह्यातील राजकारणात सामान्य माणसाला न्याय मिळत नाही म्हणून आता संघर्ष करावा लागणार आहे. जिल्ह्यातील गुन्हेगार मोकाट सुटले असल्याचे यावेळी बोलताना आमदार नारायण कुचे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here