शहरात मीटर संथ करणारी तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोलची किट बसविणारी टोळी सक्रीय झाली असल्याने शहरात स्मार्ट वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महावितरणकडून वीज चोरी पकडण्यासाठी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या मार्गदर्शनात आणि अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या पुढाकाराने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ९३ वीज चोरांनी २,३२,५०० युनिटची वीज चोरी केली असल्याचे आढळून आले. त्यामुळे या वीज चोरांवर ४३ लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आला असून त्यांच्याकडून ३९.८९ लाखाचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
महावितरणच्या या विशेष मोहिमेत रिमोट कंट्रोल तसेच मीटर संथ करणाऱ्या टोळीसाठी सापळा रचण्यात आला असून त्यांच्या विरोधात थेट फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. वीज चोरीची दंडात्मक रक्कम न भरणाऱ्या ५ ग्राहकांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रीया महावितरणने सुरू केली आहे. याशिवाय वीज चोरीची दंडात्मक रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात येणार आहे.
कारवाई करण्यात आलेल्या ९३ वीज चोरांपैकी २४ वीज चोर हे शहर उपविभाग १, उपविभाग-२ मधील ४७ आणि उपविभाग -३ मधील २२ वीज चोरांचा समावेश आहे. थेट वीज चोरी करणाऱ्या या ग्राहकांचे वीज मीटर तपासले असता वीज चोरीचे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे. मीटरमध्ये रिमोट किट बसवून दुरूनच मीटर बंद करणे, मीटरमध्ये चीप बसवून मीटर संथ करणे, मीटरला मागच्या बाजूने होल करून मीटरमध्ये रेजिस्टंट तयार करणे तसेच मीटर बायपास करून थेट वीज पुरवठा घेणे असे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे.
विशेष म्हणजे ९३ पैकी १० ग्राहक रिमोटव्दारे वीज चोरी करत असल्याचे उघडकिस आले आहे. याशिवाय ३ ग्राहक थेट हूक टाकून वीज चोरी करत असल्याचे उघडकिस आले आहे. कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांच्या नेतृत्वात आणि शहरातील तीनही उपविभागाचे अतीरिक्त कार्यकारी अभियंते प्रदिप अंधारे, संजय कुटे आणि संजय गीरी यांच्या विशेष सहभागाने सुरू असलेली महावितरणची विशेष मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून या मोहिमेत नियोजनबध्द संशयीत ग्राहकांवर धाडी टाकून कारवाई करण्यात येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times