मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. भिंतीचा ढिगारा बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. चेंबूरमध्ये आतापर्यंत 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू
विक्रोळीतही एक दुर्घटना घडली आहे. येथे भिंत पडल्यामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथेही बचावकार्य सुरू आहे. मुंबईत आताही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे हिंदमाता, सायन, किंग सर्कल, कुर्ला अशा अनेक सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हिंदमाताला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पालिकेचे पथक पंपांच्या माध्यमातून हे पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने (Mumbai Rain Update) जोरदार हजेरी लावली आहे. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ढगांनी मोठी दाटी केली आहे. मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान खात्याने रविवारीही मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात एकाच दिवसात इतका पाऊस झाला आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, याआधीही मुंबईत १५ जुलै २००९ रोजी २७४.१ मिमी पाऊस पडला होता तर २ जुलै २०१९ रोजी ३७६.२ मिमी पाऊस पडला. यामुळे लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times